Tuesday, April 20, 2010

मनातलं काहीसं......

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, मातोश्री जिजाबाई, छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्याचे असंख्य शिलेदार , किल्लेदार, शिपाई, अनेक ज्ञात अज्ञात वीरांना तसेच ज्यांचे अत्यंत महत्वपूर्ण कार्य या स्वराज्य निर्माणात आहे असे अनेक दुर्ग' या सर्वाना प्रथम सादर प्रणाम !!!

दुर्ग भ्रमंतीला 'यात्रा' असे संबोधन का ?
चारधाम, अष्टविनायक, वैष्णोदेवी ई. धार्मिक ठिकाणे आपल्याकडे प्रसिद्ध आहेत. तिकडे आपण जाऊन आलो तर यात्रेला जाऊन आलो असे म्हणतो. उ.दा. चारधाम यात्रेला जाऊन आलो. तोंडून पटकन चारधाम सहलीला जाऊन आलो असे येत नाही किंवा माथेरान यात्रा केली असेही म्हणत नाही. हे असे का ? याचे कारण मला असे वाटते कि या ठिकाणांना एक विशिष्ट महत्व, पाया आहे.मग तो धार्मिक असेल किंवा आध्यात्मिक असेल. आणि म्हणूनच हि आपल्यासाठी तीर्थक्षेत्रे होतात.
तीर्थक्षेत्रांना जसा धर्माचा पाया तसाच या दुर्गाना इतिहासाचा. या दुर्गांचे स्थान, महात्म्य ऐतिहासिक दृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या खूप आहे.इथल्या भूगोलाचा अभ्यास आणि उपयोग करून इतिहास घडविला गेला आहे. 'थोरले स्वामींनी हे राज्य गडावरूनच निर्माण केले' यातच सर्व काही आले.मग दुर्गप्रेमींसाठी हि तीर्थक्षेत्रेच नाहीत का ?
जसे धार्मिक ठिकाणी गेल्यावर त्या स्थानाचे पावित्र्य आपण राखतो तसेच जेवा दुर्गांवर जाऊ तेव्हा सुद्धा राखलेच पाहिजे नव्हे ते आपले कर्तव्यच आहे.

ही कसली मानसिकता ?
इतका सुंदर निसर्ग आपल्याला लाभला आहे. सुंदर किल्ले, त्यांचे भव्य बुरुज, तटबंदी, मोठमोठ्या पाण्याच्या टाक्या काय काय सांगू ? पण, पण आज किल्ल्यांवर गेल्यावर चित्र काय दिसते तर गडावर केलेला प्लास्टिक चा कचरा, तत्बंदीच्या भिंतींवर लिहिलेली नवे, दारूच्या फुटलेल्या बाटल्या,पाण्याच्या टाक्यांमध्ये पडलेले प्लास्टिक..गडावर दारूच्या पार्ट्या करणे, आपली नावे कोरणे, नासधूस करणे यात कसले आलेय कर्तृत्व ? खरोखरच स्वतःबद्दल एवढा अभिमान असेल तर असे काहीतरी करून दाखवावे कि जग स्वतःहून तुमचे नाव काढेल.
आपल्या घरात आपण कचरा करतो का ? गोळी खाल्ल्यावर त्याचे प्लास्टिक तसेच कुठेतरी टाकतो का ? नाही ना..ते आपण कचरा पेटीतच टाकतो ना.मग बाहेर गेल्यावरच आपण घाण का करावी ? शहरात सुद्धा अशा गोष्टी आपल्या बाजूला सर्रास घडताना दिसतात.....रस्तावर थुंकणे , प्लास्टिक फेकणे अशा गोष्टी आता ' झालेल्या आहेत ..आणि असे करण्यात अगदी शिकली सवरलेली माणसे सुद्धा मागे नसतात..असो ...सांगायचे एवढेच कि घरात कचरा करत नाही , कुठेतरी थुंकत नाही , घराच्या भिंतीवर आपली नावे कोरत नाही मग बाहेर गेल्यावरच अक्कल गहाण का टाकली जाते ??? आपल्या सुदैवाने आपल्याला एवढा निसर्ग लाभलेला आहे , एवढे किल्ले आपल्या या महाराष्ट्रात आहेत , मग हा ठेवा जपणे हे आपले कर्तव्य नाही का ?
आपण काय काय करू शकतो ?
१) सर्वप्रथम आपण स्वतः दुर्गभ्रमण या क्षेत्राची ओळख करून घेणे .म्हणजे काय तर फिरायला सुरुवात करायची ...अर्थात , नवीन असताना एकट्याने साहस करू नये ..योग्य मार्गदर्शन ,सोबत घेऊनच सुरुवात करावी ..सुरुवातीला वाटेल कि डोंगर चढून जाऊन दगड धोंडे काय पहायचे ..पण एकदा वर गेल्यावर निसर्गाचं जे रूप न्याहाळायला मिळते , जो भन्नाट वारा
अंगावर घ्यायला मिळतो ते खूपच सुंदर असते ..एवढी तंगडतोड केल्याचा थकवा कुठल्याकुठे पळून जातो ,शुद्ध हवा भरभरून प्यायला मिळते , डोंगरावर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणे ही एक वेगळीच नशा आहे ..हे स्व अनुभवावरून सांगू शकतो ..काही किल्ल्यांच्या वाटा कठीण असतात , वर जाईपर्यंत बऱ्याच अडचणींना तोंड देत जावे लागते ...असे प्रसंग आपला आत्मविश्वास वाढवायला मदत करतात ..एकदा का फिरायला सुरुवात झाली कि कधी या निसर्गाच्या , किल्ल्यांच्या आपण प्रेमात पडतो समजत सुद्धा नाही ..मग हळूहळू याचे 'व्यसन ' जडत जाते ..अर्थात हे चांगलेच व्यसन आहे ..
२) नवीन नवीन मुला मुलींना या क्षेत्राची माहिती करून देणे ..त्यांना आपल्या सोबत घेऊन जाने ...भविष्यात त्यांच्यातून काही जण असे तयार होऊ शकतात कि जे या क्षेत्रात career करू शकतात ..
३) इतिहास , ऐतिहासिक चरित्रे , लढाया , दुर्गभ्रमण या विषयांवरची बरीच पुस्तके आज आपल्या सुदैवाने उपलब्ध आहेत ...ही पुस्तके वाचून आपण या विषयांबाबतचे आपले ज्ञान वाढवू शकतो ...
४) आपल्या आवडी -निवडी या विविध प्रकारच्या असू शकतात ..कोणाला फक्त निसर्गात भटकणे आवडते ...कोणाला पाने , फुले ,झाडे , पक्षी , प्राणी , फुलपाखरे यांची आवड असते ...तर कोणाला इतिहासाची ....दुर्ग -संवर्धन हा ही एक महत्वाचा विषय आहे .याची आज जास्त गरज आहे ....धासाल्णारे तट -बुरुज आधाराची वाट पाहतायत .....वरील विविध विषयांवर काम करणाऱ्या संस्थांमध्ये सहभागी होऊन आपण आपले योगदान देऊ शकतो ...

या व्यतिरिक्तही करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी सांगायच्या राहून गेल्या असतील ....आपल्याला आवडी आणि शक्यातेप्रमाणे जेवढे जमेल तेवढे आपण करावे ...खूप काही नाही करू शकलो तरी थोडेफार का होईना ' फुल ना फुलाची पाकळी ' म्हणून जी काही मदत होईल तशी करावी , हे ही नसे थोडके ...'किती केले ' यापेक्षा 'काय केले ' हे जास्ती महत्वाचे आहे , बरोबर ना ?

मार्च १९९७ , रंगपंचमी ....आजही आठवतो तो दिवस ..याच दिवसापासून दुर्ग भटकंतीला सुरुवात झाली ती आजतागायत सुरु आहे आणि जो पर्यंत शरीर साथ देईल तोपर्यंत सुरूच राहील ..१३ वर्षांमध्ये या गड -किल्ल्यांनी , या निसर्गाने जे प्रेम दिले आहे , जो आत्मविश्वास दिला आहे ते शब्दात मांडणे कठीण आहे ...मित्रहो , हा अनुभव तुम्हाला सुद्धा नक्कीच आला असेल ..हे प्रेम या पुढेही असेच कायम राहो किंबहुना वाढत जो हीच प्रार्थना !!!
एका कवितेच्या छान ओळी आठवल्या , त्याचा उल्लेख करावासा वाटतोय ,
रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी ,
हिरे माणके ही आम्हाला दुसरी दौलत नाही !!!

!!! जय भवानी , जय शिवाजी !!!